News: राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – २०२३ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन,छायाचित्रे,वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०२४ असा आहे.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२३ चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या https://www.maharashtra.gov.in/ आणि महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२ येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येतील.
राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार हा राष्ट्रस्तरीय, अन्य ११ राज्यस्तरीय तर ८ विभागीय स्तरावरील पुरस्कार असे एकूण २० पुरस्कार प्रदान करण्यात येतात. इच्छुकांनी आपला अर्ज जिल्हा माहिती कार्यालय पुणे येथे तीन प्रतीत सादर करावा, असे जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे यांनी कळविले आहे.