आपला जिल्हा

News: कायदा सुव्यवस्थेसाठी सतत कर्तव्यदक्ष असलेल्या पोलीस दलाच्या सन्मानाचा उपक्रम कौतुकास्पद : राज्यपाल

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): आपले सण उत्सव निर्विघ्नपणे साजरे व्हावेत म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतत कर्तव्यदक्ष असलेल्या पोलिसांच्या कार्याचा सन्मान करण्याचा लेक्सिकॉन समुहाचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. विकसित भारताकडे वाटचाल करत असताना राष्ट्र उभारणीस मदत करणाऱ्या बातम्या आणि दृष्टिकोन कसे मांडायचे याबाबतही पत्रकारितेमध्ये विचार झाला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

पुणे टाइम्स मिरर आयोजित ‘बिग सॅल्युट – ऑनरिंग हिरोज इन खाकी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल शाळेमध्ये आयोजित या कार्यक्रमास पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, लेक्सिकॉन ग्रुपचे प्रेसिडेंट पंकज शर्मा, व्हॉईस चेअरमन नीरज शर्मा, सामाजिक कार्यकर्ते डॉ. वेदप्रकाश शर्मा, पुणे टाइम्स मिररच्या संचालक शीतल बियाणी, लेक्सिकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे चेअरमन सुखदेव शर्मा आदी उपस्थित होते.

पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मानाचा ‘बिग सॅल्यूट’ कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल लेक्सिकॉन समूहाचे अभिनंदन करून राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले, पोलीस दल सतत कार्यरत दिसत असूनही पोलीस दलाच्या कामाची फारच क्वचित प्रशंसा होते. शहरांची लोकसंख्या लक्षात घेता भारतीय पोलिसांवर खूप ताण असतो. त्यामुळे पोलिसांच्या कार्याचा सन्मान करण्याचा कौतुकास्पद उपक्रम पुढे सुरूच रहावा.

ते पुढे म्हणाले, तरुण युवा युवतींना पोलिसांचे काम समजले पाहिजे. यासाठी विशेषतः शैक्षणिक संस्थेत असे कार्यक्रम होणे महत्वाचे आहे. राष्ट्र चालवणे ही सामुहिक जबाबदारी असून समाज आणि सरकार बरोबरीने काम करतात, तेव्हा यश मिळते, असेही ते म्हणाले.

पुणे मिररच्या मुंबई आवृत्तीच्या आरंभाबद्दल अभिनंदन करून राज्यपाल म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रात बदल घडत आहेत. विज्ञान, कला, नागरी समाज, न्यायशास्त्र, पत्रकारिता, छायाचित्रण या सर्व क्षेत्रांत वेगाने बदल होत आहेत. जुन्या पिढीला बातम्या, दृष्टिकोन, मते आणि अफवा यामध्ये फरक करणे कठीण होत चालले आहे. प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. हा स्तंभ मजबूत असली पाहिजे. चांगल्या पत्रकारितेची परिभाषा प्रामाणिकपणातून प्रतिबिंबीत होते आणि प्रामाणिकपणासाठी भीतीपासून मुक्ती आवश्यक असते, असेही राज्यपाल म्हणाले.

आज तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली असून छापील वृत्तपत्रांपासून आज समाजमाध्यमे ऑनलाइन न्यूज पोर्टल्सकडे आलो आहोत. पत्रकारिता असो, तंत्रज्ञान असो किंवा विकास असो, चांगले आणि वाईट याचा निर्णय त्यामागील नैतिकतेवर अवलंबून असतो. पत्रकारितेचे मोजमापही त्याच निकषावर केले पाहिजे. माध्यमांनी दुर्बल घटकांचे प्रश्नही मांडले पाहिजेत, असे विचारही त्यांनी व्यक्त केले.

शैक्षणिक संस्थांमध्ये संगीतासारख्या कलागुणांनाही वाव देणे आणि पाठ्यपुस्तकाबाहेरच्या जगातील अनुभवातून शिकता येणाऱ्या गोष्टी आत्मसात करणे महत्त्वाचे असल्याचेही राज्यपाल म्हणाले.

पंकज शर्मा म्हणाले, आपण आपल्या बरोबरच्या लोकांना प्रोत्साहन देत पुढे नेण्याने खूप मोठे काम होते. आज सत्कार होत असलेल्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी असेच आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास या सहकाऱ्यांकडून अधिक चांगली कामगिरी होईल. पुणे शहराची मोठी लोकसंख्या पाहता पुणे पोलिसांकडून खूप आव्हानात्मक काम यशस्वीरित्या होत आहे, असेही ते म्हणाले.

नीरज शर्मा यांनीही आपल्या भाषणात पोलीसांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी पुणे टाइम्स मिररच्या मुंबई आवृत्तीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला बिग सॅल्युट कार्यक्रमात सन्मानित केले जाणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी, लेक्सिकॉन समुहाचे पदाधिकारी, लेक्सिकॉन इंटरनॅशनल शाळेचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button