आपला जिल्हा

News: शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी : कृषी विभागाचे आवाहन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): येत्या खरीप हंगाम २०२६ मध्ये कृषी विभागाच्या विविध निविष्ठा व लाभाच्या योजनांपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी अद्याप फार्मर आयडी न काढलेल्या सर्व शेतकऱ्यांनी (पी.एम. किसान व वनपट्टाधारक शेतकरी सहित) तात्काळ आपल्या नजीकच्या नागरी सुविधा केंद्र किंवा संबंधित यंत्रणेमार्फत फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

अॅग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार राज्यात केली जात आहे. राज्यातील अंदाजे १७१ लाख खातेदार शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी देण्यात येणार असून विशेषतः राज्यातील ११९ लाख पीएम किसान लाभार्थी शेतक-यांना ओळखपत्र प्रदान करून या योजनेअंतर्गत सामावून घेण्याचे उदिष्ट आहे.

राज्यात कृषी विभागाच्या विविध योजना व अनुदानांचा लाभ पारदर्शक आणि प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिनांक १५ एप्रिल २०२५ पासून फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या अॅग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याची स्वतंत्र डिजिटल ओळख निर्माण करण्यात येत असून त्याद्वारे विविध कृषी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

अॅग्रीस्टॅक पोर्टलवरील उपलब्ध माहितीनुसार राज्यात एकूण १७१ लाख खातेदार असून त्यापैकी १३३ लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडी प्राप्त केला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील एकूण नोंदणीकृत लाभार्थी ११९ लाख लाभार्थी असून त्यामधील ९१.२७ लाख सक्रिय लाभार्थी असून त्यापैकी ८० लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण केली आहे. याशिवाय अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणीसाठी उपलब्ध एकूण १ लाख ३ हजार वनपट्टाधारक शेतक-यांपैकी ८ हजार ३१५ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी साठी नोंदणी केलेली आहे.

कृषी विभागाचे सचिव यांच्या निर्देशानुसार ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आयडी काढलेले नाहीत अशा पी.एम. किसान योजनेचे लाभार्थी व वनपट्टा धारक शेतकरीसहित शेतकऱ्यांचे फार्मर आयडी ३० जून २०२६ पूर्वी काढून घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापक मोहीम हाती घेऊन या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढून घेण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

सर्व जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची फार्मर आयडी नोंदणी शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशा सूचना राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून या मोहिमेस सर्व संबंधित विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे संचालक ॲग्रीस्टॅक अंकुश माने यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button