News: एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामात योग्य नियोजन करा : तालुका कृषी अधिकारी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): एल निनो या हवामानावर बदलामुळे आपल्या भागात पाऊस कमी जास्त पडणे, पावसाचा खंड पडणे आणि पावसाचे असमान वितरण होणे अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बियाणे उगवण, फुल व फळ धारणावर विपरीत परिणाम होऊन उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे, एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे, आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे.
कोरडवाहू शेती करण्याऱ्यांनी जमिनीची कमीत कमी हलवाहलव करून पेरणी करावी तसेच भारी मध्यम जमिनीत पेरणी रुंद सरी वरंबा पद्धतीने करणे, उतरला आडवी पेरणी करणे, कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या पिकांची वाणांची निवड करणे. लहरी हवामानात शेतीमधील जोखीम कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. जमिनीची जलधारणा क्षमता वाढवण्यासाठी मूळस्थानी जलसंधारण वा जलतारा-शोषखड्डे शेतामध्ये राबवावेत.

पाणी व्यवस्थापन साठी ठिबक व तुषार सिंचन संचाचा वापर करणे, रासायनिक खतांवर पूर्णपणे अवलंबून न राहता सेंद्रिय, जैविक खताचा वापर प्रामुख्याने करणे. कीडरोग व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने करावे. ७५-१०० मिलिमीटर पाऊस पडल्यानंतर पुरेशी ओल असताना पेरणी करणे. लहरी हवामानामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पिक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. कृषी सल्ला, हवामान अंदाज, बाजारभाव साठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे महाविस्तार ए.आय. अॅप चा वापर करावा. एल निनो प्रभावापासून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगून उपयोजना कराव्यात, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे.



