धार्मिक

जेजुरी: सोमवती यात्रेनिमित्ताने लाखों भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या असल्याने जेजुरीत आज सुमारे तीन ते चार लाखावर भाविकांनी कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. रांगेत उभे राहून भाविक दर्शन घेत होते. येळकोट येळकोट जय मल्हार सदांनंदाचा येळकोट जयघोष आणि भंडारा खोबऱ्यांची मुक्त हस्ताने उधळण करीत यात्रा पूर्ण करीत होता. या वर्षातील शेवटची यात्रा, पुढील वर्ष २०२५ मध्ये एकही सोमवती यात्रा नसल्याने भाविक मोठ्या संख्येने देवदर्शन करण्यासाठी काल रविवार पासूनच जेजुरीत येत होते.

रविवारी उत्तररात्री पहाटे ४ वा. सोमवती आमवस्येला प्रारंभ होत असल्याने ग्रामस्थांनी भर सोमवती यात्रेचा निर्णय घेतला होता. संपूर्ण दिवसभर अमावस्या असल्याने भाविक जेजुरीत मिळेल त्या वाहनाने येत होते. दुपारी १ वाजता पेशव्यांच्या आदेशाने देवाच्या उत्सव मूर्तीचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आला. यावेळी देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त मंगेश घोणे,अनिल सौन्दडे, पोपट खोमणे, ऍड विश्वास पाणसे, डॉ. राजेंद्र खेडेकर, ऍड पांडुरंग थोरवे उपस्थित होते.

गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्याने कऱ्हा स्नानासाठी कूच केले. यावेळी देव संस्थानच्या वतीने बंदुकीची फैरी झाडून सलामी देण्यात आली. गडातील, व गडकोटाच्या सज्जातील भाविकांनी ‘येळ कोट येळकोट जय मल्हार’, तसेच ‘सदांनंदाचा येळकोट’ चा जयघोष करीत भंडार खोबऱ्याची मोठ्या प्रमाणावर उधळण करीत देवाला मान दिला. संपूर्ण गडकोट पिवळ्या जर्द भंडारऱ्यात न्हाऊन निघाला होता.

पालखी सोहळा गड कोटातून कऱ्हा स्नानासाठी बाहेर पडला. खांदेकरी, मानकऱ्यांनी उत्सव मूर्तीची वजनाने खूप जड असणारी पालखी आपल्या खांद्यावर पेलत गडावरुन शहरातील मुख्य नंदी चौकात आणली. तेथून ऐतिहासिक चिंच बागेतील होळकर मंदिराचा मान घेऊन जानुबाई चौक मार्गे शिवाजी चौकात सोहळा आला. तेथून कोथळे रस्त्याने सोहळ्याने कऱ्हा नदीकडे कूच केले.

या पालखी सोहळ्यात पालखी सोहळ्याचे खांदेकरी, मानकरी, पुजारी सेवक वर्ग, विश्वस्त, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. तसेच या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button