News: तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन व सेवनावर बंदी घालावी : डॉ. गंगवाल

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : तंबाखूच्या सेवनामुळे भारतात दररोज जवळपास १० हजार पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडतात. हृदयरोग, कर्करोग, एड्स यापेक्षाही तंबाखूचे व्यसन अधिक घातक आहे. त्यामुळे विषवल्ली तंबाखूला समाजातून हद्दपार करण्यासाठी तंबाखूचा समावेश अंमली पदार्थांच्या यादीत करावा. तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन व सेवनावर बंदी घालावी,” अशी आग्रही मागणी शाकाहार व व्यसनमुक्ती कार्यकर्ते, सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली.

३१ मे हा दिवस जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने डॉ. कल्याण गंगवाल यांनी पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय कृषी मंत्र्यांना, तसेच राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. सर्वजीव मंगल प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ. कल्याण गंगवाल गेली ३५ वर्षे तंबाखूमुक्त भारत आंदोलन राबवत आहेत.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “तंबाखू शेतीवर बंदी घालण्याची मागणी याआधीही केंद्रीय कृषिमंत्री यांच्याकडे केली आहे. तरुण पिढीला तंबाखूमुक्त व व्यसनमुक्त करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालणे गरजेचे आहे. तंबाखू सेवन करणाऱ्यांना आवाहन करतो की, सिगारेट, बिडी, जर्दा, मावा, गुटखा, मशेरी, तपकीर याचा वापर करू नये. तंबाखू विक्रेत्यांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये.”